सिध्दार्थ
गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक
अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली.
शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही
दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे
दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीतहोते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. त्यावर्षीत्यांच्या मध्ये फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.
शाक्याच्या
सेनापतीने कोलियांच्या विरुध्द युध्द पुकारण्याचा ठराव शाक्य संघामध्ये
मांडला. सिध्दार्थाने या ठरावाला विरोध केला. सिध्दार्थ म्हणाले, “युध्दाने
कोणतेही प्रश्न सुटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही.
त्यामुळे दुसर्या युध्दाची बिजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्त्या करतो,
त्याला त्याची हत्त्या करणारा भेटतो. जो दुसर्याला जिंकतो, त्याला
जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा
भेटतो. हा प्रश्न दोन्हिही बाजूचे प्रतिनिधी निवडुन सामोपचाराने मिटवावे ” परंतू
सिध्दार्थाने मांडलेल्या या सुचनेचा काहिही उपयोग झाला नाही. सिध्दार्थाने
सैन्य भरतीच्या निर्णयाला सुध्दा विरोध केला. या विरोधामुळे सिध्दार्थाला
शाक्य संघाच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार होते. त्याचे तीन स्वरुप
होते. एक सैन्यात दाखल होऊन युध्दात सामील होणे, दुसरे देहान्तशासनाला अथवा
देशत्यागाला संमती देणे व तिसरे आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार
ओढऊन घेऊन, त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला आणि
तिसरा पर्याय न स्विकारता त्यांनी परिवर्ज्या घेऊन देशत्याग करायाचे
ठरविले.
सिध्दार्थ
त्याची आई-गौतमी, वडील-शुध्दोधन व पत्नी-यशोधरा यांना भेटायला महालात
गेले. आई-वडील अत्यंत दु:खमग्न झाले होते. यशोधराने मात्र धैर्याने व
उदात्त मनाने अनुमती देऊन सिध्दार्थाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यशोधरा
म्हणाली, “ ज्या
अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या
अर्थी आपण एक असा नवीन जेवनमार्ग शोढुन काढा की, तो सकल मानवजातीला
कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”
मानवजातीच्याकल्याणाचाध्यास
घेऊन सिध्दार्थाने राजगृह सोडला. राजगृह सोडण्याचे व परिव्रजा घेण्याचे
हेच एक कारण होते. ज्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुध्द
आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये केला आहे. मृत देह, आजारी आणि जराजर्जर
झालेला व्यक्ती पाहून सिध्दार्थाने परिव्रजा घेतली, असे पारंपारिक व
हास्यास्पद असे उत्तर दिले जातात. हे उत्तर विश्वासार्ह नाही व बुध्दीलाही
पटण्यासारखे नाही. कारण सिध्दार्थाने आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी
परिव्रजा ग्रहण केली. परिव्रजा घेण्याचे हेच जर कारण असते तर ही तीन दृश्ये
त्यांना कधी दिसली नाहीत कां ? ह्या शेकडयांनी घडणार्या नेहमीच्या घटना
आहेत, आणि त्या तत्पूर्वी सिध्दार्थाच्या नजरेस न येणे असंभव आहे, असेया ग्रंथाच्या ‘परिचय’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे.
सिध्दार्थाला
कोलीय आणि शाक्य यांच्यातील युध्द संघर्षामुळे घर सोडावे लागले होते.
परंतू त्यानंतर शाक्यांनी कोलियांसोबत शांततेने वाटाघाटी करुन हा प्रश्न
सोडवावा म्हणून मिरवणुका व निदर्शने करुन मोठी चळवळ केली. परिनामत: कोलीय
आणि शाक्य यांच्यातसमेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला त्यांचे सोबत असलेल्या पाच परिव्राजकाने सांगितले. ते पाच परिव्राजक म्हणजेकौण्डिण्य,
अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक होते. त्यांनी सिध्दार्थाला सुचना केली
की, ‘आता यापुढे परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी
जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर राहावे. तरिही सिध्दार्थ घरी परत गेले नाहीत.
कारण त्यांनी खोलवर विचार केला की, युध्द समस्या ही मूलत: कलहसमस्या आहे.
एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि
राष्ट्रे यांच्यातच चालत आला आहे असे नव्हे: तर क्षत्रिय आणि ब्राम्हण
यांच्यात, कुटुंब-प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि
सहकार्यांत देखील चालू आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त
जरी असला तरी वर्गा-वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत
स्वरुपाचा असतो. हा संघर्ष़च जगातील सर्व दु:खाचे मूळ होय. म्हणून या
सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर शोधून काढले पाहिजे असे सिध्दार्थानेठरविले होते.
त्यामुळे
सिध्दार्थ नव्या प्रकाशाच्या शोधात निघाले. मार्गात त्यांनी भृगुॠषीचा
आश्रम पाहिला. सिध्दार्थाने त्या तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या कठोर
तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. अशा कठोर तपश्चर्या
केल्याने स्वर्गप्राप्ती होते, दु:खमार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना
सुखप्राप्ती होते व दु:ख हे पुण्याचे मुळ आहे असे त्या तपस्व्यांना वाटत
होते. हे ऎकल्यावर गौतम म्हणाला,“अशा प्रकारचा
आश्रम मी प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला
नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या
स्वर्गप्राप्तीसाठी आहे, तर ऎहिक जीवनातील दु:खाचा विचार करावा व त्यावरील
उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या.
सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वत: समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि
माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते
पाहावे अशी माझी इच्छा आहे.”
भृगुॠषीचा आश्रमसोडून सिध्दार्थ आलारकालाम या मुनीकडे वैशालीला गेले. आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिध्द होते.आलारकालामांच्या
मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल
असे सिध्दार्थाला वाटत होते. तेथे त्यांनी आलारकालामाला त्यांच्या
सिध्दांताचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली. आलारकालामांनी सांख्य
तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करुन सांगितली. तसेच त्यांनी ध्यानमार्गाचे
तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात पायर्या होत्या. सिध्दार्थ त्या
तंत्राचा रोज अभ्यास करायचा. सिध्दार्थांनी त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व
मिळविले. जेवढे काही शिकण्यासारखे होते ते आलारकालामांनी सिध्दार्थाला
शिकविले. आलारकालामांनी जे काही शिकविले त्यापेक्षा वरच्या पायरीचे शिक्षण
घेण्याकरीता सिध्दार्थ उद्दक रामपुत्त नांवाच्या योग्याकडे गेले. तेथे
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च पायरीचे शिक्षण घेऊ लागले. काही थोडया
काळातच उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी सिध्दार्थांने आत्मसात केली.
उद्दक रामपुत्ताला जेवढे काही शिकण्यासारखे होते ते उद्दक रामपुत्तांनी
सिध्दार्थाला शिकविले. आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील
प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिध्द होते. मगध देशातही अशाप्रकारे
ध्यानमार्गसंपन्न योगी होते. त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया श्वासोच्छवास
थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. ही प्रक्रिया अत्यंत दु;खदायक
होती. तरीही सिध्दार्थ ही प्रक्रिया आत्मसात करण्यात यशस्वी झाले.
समाधीमार्गाचे अशाप्रकारचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
सिध्दार्थाने
सांख्य तत्वज्ञान व समाधिमार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु
वैराग्यमार्गाची कसोटी न घेता भृगुॠषीचा आश्रम सोडला होता. म्हणून या
वैराग्यमार्गाची कसोटी सुध्दा घ्यावी म्हणजे स्वत: अनुभव घेऊन त्याविषयी
आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. म्हणून त्यांनी वैराग्यमार्गाचा अभ्यास
करण्यासाठीउरुवेला येथे निरंजना नदीच्या काठी निर्जन आणि एकांत ठिकाण निश्चीत केले. कोलीय आणि शाक्य यांच्यातसमेट
होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला पाच परिव्राजकाने सांगितले होते ते
सुध्दा याचठिकाणी वैराग्याचा अभ्यास करीत होते. वैराग्याच्या निरनिराळ्या
पध्दतीचा अवलंब करुन ते इतक्या पराकोटीला गेले होते की, ते क्षणाक्षणाला
यातना आणि वेदना घेऊनच जगत होते. अंगाचा थरकाप होईल इतक्या भयाण अरण्यात ते
राहत होते. कडक थंडीत, कडक उन्हात, काळ्याकुट्ट आणि गुदमरवून टाकणार्या
गर्द झाडीत राहत होते. जळलेल्या हाडाची ऊशी करुन स्मशानात झोपत होते.
धान्याच्या एका दाण्यावर दिवसभर गुजराणकरीत
होते. तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचे स्वरुप इतके उग्र होते की, ते अत्यंत
किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहचले होते. त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण
यांचे थरच्या थर साचून ते आपोआप पडत होते. त्यांचे पोट पाठीच्या कण्याला
चिकटले होते. याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. अशा प्रकारची त्यांची
तपश्चर्या आणि आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते. सहा वर्षेनंतर
त्यांचे शरीर इतके क्षीण झाले की, त्यांना हालचाल सुध्दा करता येत नव्हती.
इतकी कठोर तपश्चर्या करुनही त्यांना नवीन प्रकाश दिसला नाही. ज्या
प्रश्नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऎहिक दु:खाविषयीच्या
प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. त्यांनी विचार केला की,
ज्यांची शक्ती नष्ट झाली, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळूनगेला,
ज्याचे मन अशांत झाले त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल ? खरी शांती
आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच मिळु शकते. म्हणून
वैराग्यमार्गाची कसोटी सोडून त्यांनी सुजाताने दिलेले अन्न भक्षण केले.
तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा त्याग केल्यामुळे त्यांचे सोबतचे पाच
परिव्राजक रागाने त्यांना सोडून गेले.
सिध्दार्थ
गौतम उरुवेला सोडून गयेला आले. तेथे पिंपळ्वृक्षाखाली ध्यानस्थ बसले.
ज्ञान प्राप्तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या
शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या
विषयावर ध्यान करीत असता त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे
दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या;
आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी
समस्या. याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन
प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा
मार्ग दिसला.
नव्या
प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा
त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी
कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक
निर्विवाद वस्तुस्थिती आहे असे त्यांनी मान्य केले. परंतू दु:ख कसे नाहिसे
करावे ह्या प्रशानाचा विचार सांख्य तत्वज्ञानाने केला नाही. म्हणून दु:ख
कसे नाहिसे करावे या प्रश्नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित
केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणार्या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या
दोन्हिही प्रश्नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि
त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख
समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हा चार आर्यसत्याचा शोध
भगवान बुध्दांनी लावला.
भगवान
बुध्दांच्या काळात अनेक मतप्रणाली अस्तित्वात होत्या. ह्या मतप्रणाली
साधारणत: दोन भागात विभागल्या जातात. एक उच्छेदवादी व दुसरे शाश्वतवादी.
सर्व काही संपणारे आहे म्हणून खा, प्या आणि मजा करा अशी उच्छेदवादी
विचारसरणी होती. आत्मा शाश्वत आहे म्हणून हे माझे, ते माझे असे शाश्वतवादी
विचारसरणी होती. भगवान बुध्दांनी या दोन्हिही विचारसरणीला नाकारले.
भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना सारनाथ येथे धम्माचाउपदेश केला व त्यानंतर त्यांचा धम्म संपुर्ण जगात पसरला.
भगवान
बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, ‘जीवनाच्या
आत्यंतिक असे दोन टोके म्हणजे खा, प्या आणि मजा करा, आणि सर्व वासना मारुन
टाका. कारण ते पुनर्जन्माचे मुळ आहेत.’ यां दोन्हिंही टोकांनानाकारुन
जो उपभोगाचा नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही असा मध्यम मार्ग त्यांनी
स्विकारला. याच मध्यम मार्गाची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. तेव्हा हे
मध्यम मार्ग दुसरे-तिसरे काही नसून चार आर्यसत्यच आहेत. हाच मार्ग मानव
मुक्तीचा आहे. इश्वर, आत्मा वगैरे कालपनिक गोष्टीला स्थान न देता त्यांनी
‘माणूस आणि माणसाचे या जगातील नाते’ याला प्राध्यांन्य देऊन आपला धम्म
सांगितला. म्हणूनच त्यांच्या धम्माला‘एहि पस्सिको’ म्हणजे ‘या आणि प्रत्य्क्ष पाहा‘ असे म्हटले आहे.
याच सुत्तात ते पुढे म्हणतात की, “माझ्या
धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही.
माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू
आहे. मनूष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग
दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश
आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा
माझ्या धम्माचा पाया आहे.
भगवान
बुध्दांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून तर आतापर्यंत आणि भविष्यात
सुध्दा जे कोणी धम्म सांगतील ते दुसरे-तिसरे काही राहणार नसून ते चार
आर्यसत्याचाच सार राहील असे ठामपणे म्हणावे लागेल.भगवान बुध्दांने याला उत्तम शरण असे म्हटले आहे.
भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेएकान्नव व एकशेब्यान्नवव्या गाथेत म्हणतात -
दु:ख दुक्खसमुप्पादं दुक्खस्स च अतिक्क्मं ।
अरियञ्चग्ङिकं मग्गं दुक्खूपसगामिनं ॥
एतं खो सरणंखेमं एतं सरण्मुत्तमं ।
एतं सरणमागम्म सब्बदुक्खा पमुच्चति ॥
याचा अर्थ, जो चार आर्यसत्यांना योग्य प्रकारे प्रज्ञेने पाहतो वदु:ख,
दु:खाची उत्पत्ती, दु:खाचा विनाश व दु;खाचे उपशमन करणारा आर्य अष्टांगिक
मार्ग याचे शरण ग्रहण करणे हेच कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरण आहे. या
शरणाला ग्रहण करुन मनुष्य सर्व दु:खातून मुक्त होतो. परंतु यासाठी तुम्हीच
प्रयत्न केले पाहिजे असे भगवान बुध्द म्हणतात-
तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।
याचा अर्थ, तुम्हीच प्रयत्न केले पाहिजे. तथागत केवळ मार्गदाता आहे.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या ‘बुध्दांने कोणते बदल केले?’ यां भागात‘कार्याकारणभावाचा
अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसुध्दांत भगवान बुध्दांनी मान्य केले.’
असे लिहिले आहे. कार्यकारणभावाचा म्हणजेच प्रतित्यसमुत्पादाचा हाच
सिध्दांत म्हणजे चार आर्यसत्याचा अविष्कार होय. म्हणूनच दु:ख, दु:ख समुदय,
दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्ये समजणे म्हणजेच
भगवान बुध्दांचा धम्म समजणे असे म्हटल्या जाते.
तथापी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या
‘परिचय’ मध्ये चार प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्नात ते
म्हणतात की, “चार आर्यसत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे ? कारण
हे चार आर्यसत्य बुध्दाच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.”
त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात
दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल
मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक
श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल
मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान
बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्दाच्या बाबतीत असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे आहे.
भगवान
बुध्द जरी दु:खाचे अस्तित्व मान्य करीत असले तरी ते दुसर्या आर्यसत्यात
दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. दु:खाचे निरसन करण्याचा
मार्ग सुध्दा त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे
लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे, असे कसे म्हणता येईल ?
भगवान बुध्दाच्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही
अंतर्भाव आहे.
जग
आणि जीवन दु:खमय नाही तर जगात आणि जीवनात दु:ख आहे असा नवा विचार त्यांनी
मांडला. या दु:खावर मात करता येते असे त्यांनी ठासून सांगितले. या दु:खावर
मात करण्याचा उपायही त्यांनी सांगितला.
भगवान
बुध्दाने सतत आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत भ्रमण करुन विपश्यना विद्येच्या
माध्यमातून लोकांना दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. परिनामस्वरुपत: त्यांच्या
जीवनकाळामध्ये हजारो गृहत्याग करणार्या भिक्खु आणि भिक्खुंनी अरहंत
झालेत, निर्वाणपदा पोहचवून पुर्णत: दु;ख मुक्त झालेत.तसेच
अन्य भिक्खु आणि भिक्खुंनीसहित लाखोच्या संख्येत गृहास्थी जीवन जगणारे
लोकं सुध्दा सत्याचा साक्षात्कार होऊन स्त्रोतापन्न झालेत. दु:ख मुक्त
झालेत. भगवान बुध्दाचा विपश्यना मार्ग या चार आर्यसत्याचा आधार घेऊन जगातील
करोडो लोकांचे कल्याणाचा मार्ग प्रश्स्त करुन याच जीवनामध्ये प्रत्यक्ष
दु:ख-विमुक्तीचा अनुभव करुन देत आहेत.
विपश्यना
शिबीरामध्ये चित्ताला निर्मळ करुन शेवटच्या दिवशी मंगल मैत्रीचा अभ्यास
केला जात असतो. ‘भवंतु सब्ब मंगलं’ चा मंगलकारी घोषाने संपुर्ण आसमंतात
मंगल-घोषाचे तरंगच-तरंग जिकडे-तिकडे पसरत असतात.
कोणी
एखादा निष्णात डॉक्टर रोग्यांना सांगतो की, तुला अमुक रोग झाला आहे व
त्यावर मी औषधी-उपचार करुन तुझा रोग बरा करु शकतो. तो रोगी त्यांच्या
वैद्यकीय उपचाराने बरा होतो. मग त्या डॉक्टरला कोणी रोगवादी म्हणतील की
निरोगवादी ? तसेच चार आर्यसत्याच्या माध्यमातून दु:खाने पिडित असलेल्या
लोकांना दु:ख मुक्तीचा मार्ग सांगून त्यांना भगवान बुध्द याच जीवनामध्ये
दु:ख मुक्त करतात अश्या भगवान बुध्दाला आणि त्यांच्या शास्त्रशुध्द
तत्वज्ञानाला व शिकवणीलानिराशावादी कसे म्हणता येईल ?
जो
निराशावादी किंवा दु:खवादी असेल तो केवळ दु:खाचा प्रचार करेल. तो
लोकांच्या सुखाची कामना करणार नाही. मात्र ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ अशा
मैत्रीभावनेचे शिकवण देणारे भगवान बुध्द लोकांच्या सुखाची कामना करतात.
गेल्या कित्येक वर्षे भगवान बुध्दाच्या विपश्यना साधनेच्या दूर असणारे लोकं
भगवान बुध्द किती धम्मवादी, सुखवादी व मंगलवादी होते ते अशा लोकांना कसे
कळणार ?
धम्मपदामध्ये सुख आणि दु:खाच्या बाबतीत खालील दोन आहेत. पहिले पद असे आहे-
मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोती वा।
ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥
याचा
अर्थ अशुध्द चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा
त्याच्या मागे जसे गाडीला ओढणार्या बैलाच्या मागे त्या गाडीचे चाके येत
असतात तसे दु;ख त्याच्या मागे येत असतात.
दुसरे पद असे आहे-
मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।
ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥
याचा
अर्थ प्रसन्न चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा
त्याची सावली जशी त्याचा पिच्छा सोडत नाही तसे सुख त्याच्या मागे येत
असते.
स्पष्ट
आहे की मलीन चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते
दुष्कृत्येच असेल आणि दुष्कृत्याचे फळ नेहमी दु:खदच असते. त्याचमाणे निर्मळ
चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते सत्कृत्येच असेल
आणि सत्कृत्याचे फळ नेहमी सुखदच असते.
यापरुन धम्मपदामध्ये पहिल्या पदामध्ये दु:खाचे व दुसर्या पदामध्ये सुखाचे अशा दोन्हिही दु:ख आणि सुखाचे विवेचन केले आहे.
जर
धम्मपद हा ग्रंथ संपुर्णपणे वाचला तर त्यात धम्माच्या बाबतीत भगवान
बुध्दाच्या शिकवणूकीचे निरनिराळ्या विषयावर २६ वग्गाचे संकलन केलेले दिसते.
यामध्ये एक सुख वग्ग आहे. परंतु त्यात दु:खाचा एकही वग्ग नाही. म्हणून.
भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे कसे म्हणता येईल ?
भगवान
बुध्दाने जसे दु:खाबाबत चर्चा केली तसे सुखाबाबत सुध्दा केली आहे. जेथे
दु:खाबाबत चर्चा केली तेथे दु:खाचे कारणे प्रकाशात आणून ते दूर करण्यासाठी
उत्साहित केले आहे. तसेच जेथे सुखाबाबत चर्चा केलीतेथे त्याचे कारणे स्पष्ट करुन त्याचे सवंर्धन करण्यासाठीउत्साहित केले आहे. त्यामुळे भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे म्हणने चुकीचे ठरेल.
भगवान
बुध्दाचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या
अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत
करण्याचा मार्ग ते दाखवितात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, दारिद्र्य हे दु:खाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्यनाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.
सिध्दार्थ
गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे
भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान
बुध्दाचे उपदेश ह्या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे
पृथ्वीतलावर चालणार्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या
पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार
आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजूनघेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यकआहे.त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते.
भगवान
बुध्दांनी एखाद्या कुशल वैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे मुलभूत विश्लेषण
केले आहे. त्यांनी प्रथम रोगाचे निदान करुन त्याचे कारण जाणले आहे. तो रोग
कसा निर्माण होतो, हे त्यांनी जाणले आहे. नंतर तो रोग नष्ट करण्याचे
निश्चित केले व शेवटी त्यावर उपाय सांगितला. दु:ख हा रोग आहे. तृष्णा हे
त्या रोगाचे कारण आहेया
रोगावर उपाय करता येतो. आर्यअष्टांगिक मार्गाने हा रोग कायमचा बरा करता
येतो, हे सुत्र भगवान बुध्दांनी मांडले. म्हणूनच त्यांना अप्रतिम वैद्य आणि
कुशल शल्यकार असे म्हटले जाते.
आजच्या
काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान
बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही
जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन
मुक्तीच्या चार पायर्यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत
जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी
सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे
अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा
अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य
म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो.
0 Comments